*वाशी वाहतूक शाखेची २०२५ मध्ये कडक कारवाई; ६८ हजारांहून अधिक केसेस, कोट्यवधींचा दंड वसूल*

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई शहरातील वाशी वाहतूक शाखेच्या कार्यक्षेत्रात सन २०२५ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मा. पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई तिरूपती काकडे यांच्या आदेशानुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी वाहतूक शाखेने ही व्यापक मोहीम राबविली.
या कारवाईअंतर्गत एकूण ६८ हजार ५४० केसेस दाखल करण्यात आल्या असून ५ कोटी २३ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यापैकी १ कोटी ३ लाख ७८ हजार ७०० रुपयांचा दंड अद्याप प्रलंबित आहे. दारू पिऊन वाहन चालविणे, सिग्नल जंप करणे, वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर करणे अशा गंभीर स्वरूपाच्या नियमभंगांवर विशेष लक्ष केंद्रीत करून कारवाई करण्यात आली.
सन २०२५ दरम्यान ३६७ वाहनचालकांचे वाहनचालक परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव परिवहन विभागाकडे सादर करण्यात आले असून, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या ९ हजार ६११ वाहनचालकांविरोधात मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहतूक शिस्त व सुरक्षिततेला बळ मिळाले आहे.
याचबरोबर वाशी वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस रेझिंग डे तसेच रस्ता सुरक्षा अभियान २०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मस्केट, माहिती पत्रके, स्टिकर्स, हँडबील्स यांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, रिक्षा-टॅक्सी युनियन, ट्रक-टेम्पो युनियन, रहिवासी सोसायट्या तसेच विविध आस्थापनांमध्ये बैठका घेऊन रस्ता वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ व फोटो प्रसारित करूनही नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती केली जात आहे.
वाशी वाहतूक शाखेच्या या सातत्यपूर्ण कारवाई व जनजागृती मोहिमेमुळे नवी मुंबईतील रस्ते अधिक सुरक्षित बनविण्यास मदत होत असून, नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

