*नवी मुंबईत ४ ते ६ जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा; शाळांना सुट्टी, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये*
प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई : हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार ४ ते ६ जुलैदरम्यान मुंबई व मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या वारंवार सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः ४ जुलैच्या संध्याकाळपासून ५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत सर्वाधिक तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ठाणे व पालघर जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पहाटे २.३० वाजता आणि दुपारी ३.०० वाजता समुद्राला भरती येणार असल्याने जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयात (HQ) उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
याशिवाय अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, उद्यान आणि घनकचरा व्यवस्थापन (SWM) विभागातील कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष फिल्डवर उपस्थित राहून आपत्कालीन परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेने नवी मुंबईकर नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सखल भाग, समुद्रकिनारे व पाण्याने भरलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाशी १८००२२२३०९ किंवा १८००२२२३१० या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

