
(उपसंपादक) कुंडलिक कानगुडे
नवी मुंबई : कोरोना काळात आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी करणाऱ्या पालिकेने सर्वसाधारण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पावले उचलली असून कोपरखैरणे व दिघा येथे प्रत्येकी दोन माता-बाल संगोपन केंद्र उभारणार आहे. नागरी आरोग्य केंद्राचे स्थानिक पातळीवरील महत्त्व पाहता कोपरखैरणे आणि महापे एमआयडीसी क्षेत्रात चार नागरी आरोग्य केंद्र बाधले जाणार आहेत.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऐरोली व नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालये ही समर्पित करोना रुग्णालयात बदल करून करोनाव्यतिरिक्त रुग्णांसाठी तुर्भे व बेलापूर येथील माता बाल संगोपन केंद्रे अधिक अद्ययावत करून सर्वसामान्य रुग्णांची गरज भागवली जाणार आहेत.
नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणा पाच स्तरावर तयार करण्यात आलेली आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने आर्थिक सहकार्य केले होते. नागरी आरोग्य केंद्र ही पालिकेचा पाया असून अलीकडच्या करोना साथ संर्सग काळात स्थानिक पातळीवर चाचण्या व प्रबोधनाचे काम या नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. करोनाच्या दोन लाटांचा सामना करताना पालिकेने नवीन आरोग्य सुुविधा निर्माण केलेल्या आहेत. यातील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोविड काळजी केंद्र हे राज्यात प्रशंसनीय ठरलेले आहे. करोनाची साथ ओसरल्यानंतर अनेक काळजी केंद्र बंद करण्यात आलेली आहेत मात्र या संकट काळात भरती करण्यात आलेले डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी अद्याप सेवेत कायम ठेवण्यात आलेले आहेत. तिसऱ्या लाटेसाठी या डॉक्टरांची गरज भासणार आहे. यातील अनेक डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पालिका नंतर सेवेत सामावून घेण्याची शक्यता आहे. नवी मुंबईची लोकसंख्या आता १७ ते १८ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज प्रशासनाला वाटली असून उत्तर नवी मुंबईत दोन नागरी आरोग्य केंद्र व एक माता बाल संगोपन केंद्र उभारण्यात येणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. कोपरखैरणेसारख्या शहीर भागात माथाडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून बैठी घरे अधिक आहेत. या भागात नागरी आरोग्य केंद्र व माता बाल संगोपन केंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन पालिकेने या भागात एक माता बाल संगोपन केंद्र बांधणार आहे. नवी मुंबईच्या पूर्वे बाजूस असलेल्या एमआयडीसीतील झोपडपट्टी भागात आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. त्यामुळे महापे येथे एक नागरी आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे. एमआयडीसीकडून अधिकृतरित्या भूखंड उपलब्ध होत नसल्याने पालिकेला आरोग्य तसेच शिक्षण सुविधा देताना अडचण होत आहे. सिडको किंवा एमआयडीसीकडून सार्वजनिक सेवेसाठी भूखंड हस्तांतरित झाल्याशिवाय पालिकेला या सुविधा देता येत नाही.११२ क्रमांकाचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
नवी मुंबई पालिकेने कोविड काळात अनेक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील आरोग्य यंत्रणा उभारलेल्या आहेत. मात्र कायम स्वरूपी यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याने दिघा व कोपरखैरणे येथे माता बाल संगोपन केंद्र बांधण्याच्या निविदा काढल्या जात आहेत. एमआयडीसीतही नागरी आरोग्य केंद्राची आवश्यकता असल्याने त्या ठिकाणी हे केंद्र बांधले जाणार आहेत. – संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका

