*वाशी वाहतूक शाखेची प्रभावी कारवाई; २०२६ मध्ये लाखोंचा दंड वसूल, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबईतील वाहतूक शिस्त अबाधित राखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाशी वाहतूक शाखेकडून सन २०२६ मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभावी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मा. पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग नवी मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वाशी श्री. सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी वाहतूक शाखेने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कठोर मोहीम राबवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण २७ हजार ४२४ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ८६ लाख ३३ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच प्रलंबित दंडापोटी ११ लाख ८ हजार ३०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधातही वाशी वाहतूक शाखेने कठोर पावले उचलली असून ८५ वाहन चालकांविरोधात मा. न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच सिग्नल जंप करणे, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे अशा गंभीर नियमभंग करणाऱ्या ८७ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव परिवहन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.
वाशी शहरातील अनधिकृत पार्किंगच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी देखील विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ६ हजार ९९५ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ३ हजार ३९९ वाहन चालकांविरोधात न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय नागरिकांना त्रासदायक ठरणारे कर्णकर्कश सायलेन्सर लावून वाहन चालविणाऱ्या २२ वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्याबरोबरच जनजागृतीलाही वाशी वाहतूक शाखेकडून प्राधान्य देण्यात येत आहे. पोलीस मस्केट, माहिती पत्रके, स्टिकर्स, हॅन्डबील यांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, रिक्षा-टॅक्सी युनियन, ट्रक-टेम्पो संघटना, रहिवासी सोसायट्या तसेच विविध आस्थापनांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना वाहतूक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या साहाय्याने देखील व्यापक जनजागृती केली जात आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वाशी श्री. सुनिल कदम यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे शहरात वाहतूक शिस्त निर्माण होण्यास मोठी मदत होत असून, समाजहित आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद मानले जात आहे.

