*अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था व अपंग संजीवनी सोशल वेलफेयर फाउंडेशनचा वर्धापन दिनानिमित्त स्वरनाद कराओके गीत गायन स्पर्धा 2026 उत्साहात संपन्न*

प्रतिनिधी :-जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई, कोपरखैरणे येथे रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी ज्ञानविकास स्कूल, सेक्टर 17 येथे अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र राज्य (स्थापना 2014) चा 11 वा वर्धापन दिन तसेच अपंग संजीवनी सोशल वेलफेयर फाउंडेशन (स्थापना 2021) चा 5 वा वर्धापन दिन या दुहेरी औचित्याने आयोजित “स्वरनाद कराओके गीत गायन स्पर्धा 2026” हा भव्य व अविस्मरणीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या स्पर्धेत विविध भागांतून सहभागी झालेल्या गुणी गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस सादरीकरणामुळे उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्पर्धकांना उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाची नोंद “न भूतो न भविष्यती” अशा अविस्मरणीय सोहळ्यांमध्ये झाली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ. जयश्री पी. सी. पाटील यांना दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. नवी मुंबई व कोपरखैरणे परिसरात महिलांसाठी अहोरात्र कार्य करत सायंकाळी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत अनेक महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. जयश्री पी. सी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी ज्ञानविकास स्कूलचे सचिव श्री. चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्राध्यापक सौ. शोभा पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले असून त्यांच्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक व संचालक श्री. सुरेश दुधाने, संगीत सम्राट झी टीव्ही फेम श्री. प्रसाद उलांडे, संस्थेच्या उपाध्यक्ष सौं. शोभा काळे, संचालक श्री. संतोष गोळे, कै. ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई यांचे महाव्यवस्थापक श्री. महादेव निकम, योगा प्रशिक्षक सौं. मोनिका शाह तसेच जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक श्री. राजेंद्र बोडके यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये महाव्यवस्थापक श्री. महादेव निकम यांचे विशेष योगदान व आर्थिक सहकार्य लाभले असून त्यांच्या पाठबळामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेतील सर्व स्पर्धक उत्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे परीक्षकांसमोर विजेते निवडणे अत्यंत कठीण ठरले. अखेर कठीण स्पर्धेनंतर विजेत्यांची घोषणा करण्यात आली. प्रथम पारितोषिक कु. सारा भानुशाली, द्वितीय पारितोषिक श्री. आनंद कदम आणि तृतीय पारितोषिक कु. श्रुती सावंत यांनी पटकावले.
या उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे स्पर्धेतून मिळणारा निधी दिव्यांग व निराधार महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या कौशल्य विकास व स्वावलंबनासाठी वापरणे हा आहे. या माध्यमातून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असून दिव्यांग व गरजू घटकांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेचे कार्य अधिक बळकट होत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मान्यवर, स्पर्धक, स्वयंसेवक, सहयोगी संस्था व उपस्थित प्रेक्षकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

