माजी आमदार संदीप नाईक यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश; नवी मुंबईत राजकीय हालचालींना वेग
प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
माजी आमदार संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षात पुन्हा स्वगृही प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
संदीप नाईक यांनी आपल्या सामाजिक व राजकीय प्रवासाबाबत बोलताना सांगितले की, त्यांचा प्रवास नेहमीच जनहित आणि नवी मुंबईच्या विकासाभोवती केंद्रित राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाचा आणि पाठबळाचा लाभ आपल्याला सातत्याने मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच वनमंत्री गणेश नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानले.
संदीप नाईक यांच्या पुनर्प्रवेशानंतर नवी मुंबईतील भाजपाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले. अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
देश, महाराष्ट्र आणि विशेषतः नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष हा सर्वात सक्षम, स्थिर आणि दूरदृष्टी असलेला पर्याय असल्याचे मत संदीप नाईक यांनी व्यक्त केले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या मार्गावर असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातही विकासाची गती कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईकरांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आणि शहराच्या हितासाठी आपण पुन्हा भाजपाशी जोडले गेलो असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

