*नवी मुंबईत विद्यार्थ्यांमार्फत वाहतूक जनजागृती रॅलीचे प्रभावी आयोजन*

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई येथे वाहतूक नियमांविषयी जनजागृती वाढविण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने एक कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एपीएमसी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
दि. 23 मार्च 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता माथाडी सिग्नल येथे या रॅलीची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात सुमारे 35 ते 40 विद्यार्थी तसेच वाहतूक चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन “वाहतूक नियमांचे पालन करा”, “हेल्मेटचा वापर करा”, “सुरक्षित प्रवास करा” अशा संदेशांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली.
या उपक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बाकलीवाल फाउंडेशन स्कूल च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत समाजहिताचा संदेश दिला.
यावेळी वाहतूक विभागातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यांनी रॅलीचे योग्य नियोजन, मार्गदर्शन व सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडत उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
या रॅलीमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन किती आवश्यक आहे, याची जाणीव सर्वसामान्यांना करून देण्यात आली. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे पोलीस विभाग व समाज यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होत असून, सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतुकीसाठी हे एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.

