*पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाला गती; पूर्वनियोजित मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका*
प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
मुंबई : बहुप्रतीक्षित पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्वनियोजित मार्गानेच मार्गस्थ व्हावा, या मागणीसाठी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जनतेच्या हिताचा आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेत स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
बैठकीत पुणे–नारायणगाव–बोटा–देवठाण–सिन्नर–नाशिक या पूर्वनियोजित मार्गानेच रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच जायंट मेट्रेवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) संदर्भातील तांत्रिक बाबींवर विशेष बैठक घेऊन त्याचा अहवाल केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.
पुणे–नाशिक रेल्वे मार्ग हा केवळ दोन शहरांना जोडणारा प्रकल्प नसून उद्योग, व्यापार, शेती, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने परिवर्तन घडविणारा महत्त्वाचा विकासमार्ग ठरणार असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास लाखो नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि किफायतशीर होणार असून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधित आमदार उपस्थित होते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि पूर्वनियोजित मार्ग कायम ठेवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचा निर्धारही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर अंतिम मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

