*मालमत्ता करावरील २०० टक्के व्याजदर शास्ती कमी करण्याची मागणी; थकीत वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव*
प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
दिनांक : 26/02/2026
नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम महासभेच्या द्वितीय दिनी झालेल्या बैठकीत मालमत्ता करावरील २०० टक्के व्याजदर शास्ती कमी करून ती केवळ ५ टक्के करण्याचा लोकहिताचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करून बाधित नागरिकांना सुधारित दरानुसार मालमत्ता कराची देयके देण्यात यावीत, अशी ठोस मागणी प्रभाग क्र. १८ ड चे नगरसेवक निशांत करसन भगत यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा लोकनेते ना. गणेशजी नाईक यांच्या निर्देशांनुसार नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नमूद करत, नगरसेवक निशांत भगत यांनी सन्माननीय महापौर तसेच महापालिका आयुक्त यांना लेखी मागणीपत्र सादर केले आहे. याची प्रत उपमहापौर आणि उपायुक्त मालमत्ता कर विभाग यांनाही देण्यात आली आहे.
नवी मुंबईतील विविध निवासी घटकांमध्ये गरजेपोटी केलेल्या बांधकामांवर लावण्यात आलेल्या वाढीव व्याजदरामुळे अनेक नागरिक आर्थिक अडचणीत सापडले होते. महासभेने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे भगत यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
याचबरोबर महापालिकेच्या महसुलात वाढ होण्यासाठी आणि थकीत मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या अभय योजनेद्वारे नागरिकांना दंड व अतिरिक्त शास्तीत सवलत देऊन थकीत रक्कम भरण्यास प्रोत्साहन मिळेल आणि महापालिकेलाही मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नगरसेवक निशांत भगत यांच्या या दुहेरी मागणीमुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळण्याची तसेच महापालिकेच्या तिजोरीत थकीत महसूल जमा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता प्रशासनाकडून यावर कोणती कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

