जुन्नरमध्ये बिबट्याचे वाढते हल्ले गंभीर; आमदार शरद दादा सोनावणे यांची मंत्रालयात बैठक – वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाहीचे आश्वासन दिले

मुंबई,मंत्रालय राजेंद्र बोडके :-दि. १५ जुलै :जुन्नर विधानसभा मतदारसंघात मानवी वस्त्यांमध्ये घुसून बिबट्यांद्वारे वारंवार होणाऱ्या हल्ल्यांनी नागरिक भयभीत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत आमदार शरद दादा सोनावणे यांनी हा मुद्दा ठोसपणे मांडला. यावेळी त्यांनी सांगितले की, २०२० पासून आतापर्यंत ७ हून अधिक नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये बळी गेला असून, २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
सततचे हल्ले आणि अपुरी यंत्रणा:
बिबटे दिवसाढवळ्या मानवी वस्तीत घुसत असून, महिला, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार सोनावणे यांनी यासंदर्भात स्थायी पिंजरे, गस्त पथके, तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा आणि पीडितांना त्वरित मदत निधी यासारख्या उपाययोजनांची गरज अधोरेखित केली.
वनमंत्री गणेश नाईक यांची तत्परता आणि संवेदनशीलता:
या बैठकीत वनमंत्री नामदार गणेश नाईक यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत आमदार शरद दादा सोनावणे यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी मानवी वस्त्यांमधील बिबट्यांच्या हालचाली रोखण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल आणि वनविभागाला आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले जातील, असे स्पष्टपणे सांगितले.
वनमंत्री नाईक यांची कार्यपद्धती आणि संवेदनशील नेतृत्व:
राज्याचे वनमंत्री म्हणून गणेश नाईक यांनी नेहमीच पर्यावरण संरक्षणासोबतच मानवाच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील समस्या समजून घेऊन, योग्य त्या निर्णयासाठी ते नेहमीच तत्पर राहिले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत निर्णयक्षमतेसह मानवी भावनिकतेची जाणीवही ठळकपणे दिसून येते.
नागरिकांमध्ये समाधानाची भावना:
वनमंत्री गणेश नाईक यांच्या आश्वासनामुळे जुन्नर तालुक्यातील नागरिकांत काहीसा दिलासादायक विश्वास निर्माण झाला आहे. आमदार शरद दादा सोनावणे यांचाही सातत्याने आणि ठामपणे जनतेच्या समस्यांबाबत शासन पातळीवर पाठपुरावा सुरु आहे.

