अकोले तालुक्यातील मन्याळे येथे आईसह दोन मुलींची आत्महत्या
अकोले तालुक्यातील मन्याळे येथे आईच्या आत्महत्येनंतर दोन्ही मुलींनीही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मन्याळे येथील सुनीता अनिल जाधव (वय ४८) या महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनीही गावातीलच एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्राजक्ता (वय २२) आणि शीतल (वय १८) असे या मुलींची नावे आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिनही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, तिघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आईच्या आत्महत्येनंतर मुलींनीही आपली जीवनयात्रा संपविल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, पोलिसांच्या तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होईल. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने मन्याळे गावासह अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

