*मोठी बातमी ! अजित पवार तडकाफडकी दिल्लीला रवाना; नेमकं कारण काय?*
विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. पवार यांच्या अनपेक्षित दिल्लीवारीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये राज्यात होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार हे दिल्लीत गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिल्लीवारीमुळे राज्यात लवकरच मोठ्या राजकीय हालचाली घडण्याचा अंदाज आहे. लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाचे वाटप होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील अजित पवारांच्या सोबत आहेत, अजित पवार दिल्लीत कोणाला भेटणार, कोणाशी चर्चा करणार, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे.

