*जुन्नर तहसीलदार पद रिक्त; नागरिकांना प्रशासनिक कामांसाठी करावा लागत आहे मनस्ताप*
प्रतिनिधी :-कैलास बोडके
पुणे जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आणि आदिवासी व डोंगरी भागांनी व्यापलेला जुन्नर तालुका सध्या पूर्णवेळ तहसीलदाराविना प्रशासन चालवत असल्याचे वास्तव समोर आले आहे. तत्कालीन तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्या बदलीनंतर हे महत्त्वाचे पद अद्याप रिक्त असून सध्या अतिरिक्त कार्यभार बाळासाहेब शीरसाठ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
डॉ. सुनील शेळके यांच्या कार्यकाळात शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. ई-फेरफार, ई-हक्क, ॲग्रीस्टॅक, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त मोहीम यांसारख्या उपक्रमांमध्ये जुन्नर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता.
मात्र, त्यांच्या बदलीनंतर तहसीलदार पद कायम रिक्त असल्याने महसूल विभागातील विविध प्रशासकीय कामांमध्ये विलंब होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, विविध दाखले, संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित कामे तसेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विषयक प्रकरणांमध्ये अतिरिक्त कार्यभाराचा परिणाम जाणवत असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर काही नायब तहसीलदार पदेही रिक्त असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
जुन्नर तालुक्याचा विस्तीर्ण भौगोलिक परिसर, दुर्गम आदिवासी भाग आणि वाढते प्रशासकीय कामकाज लक्षात घेता येथे सक्षम आणि पूर्णवेळ तहसीलदाराची नियुक्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी नागरिक, शेतकरी व विविध सामाजिक स्तरांतून होत आहे.
महसूल प्रशासन अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे.

