*विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीचे संस्कार; वाशी वाहतूक पोलिसांचा आदर्श उपक्रम*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र
नवी मुंबई : वाहतूक नियमांचे पालन ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सुरक्षित जीवनाची गुरुकिल्ली आहे, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी वाशी वाहतूक शाखेतर्फे १५ जुलै रोजी सेक्टर १५, वाशी येथील शंकरराव विश्वासराव पाटील एनएमएमसी शाळा क्रमांक ११० मध्ये वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम, आरटीओ अधिकारी तसेच पोलीस नाईक शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षिततेचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, सिग्नलचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टची आवश्यकता तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात शाळेचे सुमारे १०० विद्यार्थी व चार शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहतूक नियमांचे पालन केल्यास स्वतःचा तसेच इतरांचा जीव सुरक्षित राहतो, याची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांच्या मनात वाहतूक शिस्तीचे संस्कार बालपणापासूनच रुजविण्याचा वाशी वाहतूक पोलिसांचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यात अपघातमुक्त व शिस्तबद्ध समाज घडविण्यासाठी अशा जनजागृती मोहिमा महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
रस्ते सुरक्षा आणि वाहतूक शिस्तीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वाशी वाहतूक शाखेकडून सातत्याने राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजहिताचे असून, वाहतूक पोलिसांच्या या सकारात्मक प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

