*अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा? संशय; रोहित पवारांचा खळबळजनक दावा*
प्रतिनिधी :-जनतेचा सावधान महाराष्ट्र
मुंबई, दि. १० फेब्रुवारी २०२६ – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर संशय व्यक्त करत हा अपघात साधा नसून नियोजित घातपात असण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी तब्बल ५० स्लाईड्सच्या सादरीकरणाद्वारे विमान, पायलट, विमान कंपनी, बारामती विमानतळ, हवामान स्थिती आणि प्रवासाच्या वेळापत्रकासंदर्भातील माहिती मांडली.
रोहित पवार यांनी २७ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या नियोजित कार्यक्रमाचा तपशील देत सांगितले की, मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर काही तास काम करून ते मुंबईला जाणार होते. मात्र एका “फार मोठ्या नेत्याच्या” भेटीमुळे चर्चा लांबली आणि नियोजित वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे मुंबईहून पुण्याला कारने जाणे शक्य न झाल्याने विमान प्रवासाचा पर्याय स्वीकारावा लागला, असा दावा त्यांनी केला.
या संदर्भात रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. अजित पवार यांना केवळ विमानानेच प्रवास करण्यास भाग पाडले गेले का, विमान कंपनीचा मालक आणि पायलट यांची पार्श्वभूमी काय आहे, ताफा तयार असताना शेवटच्या क्षणी विमान प्रवास का करावा लागला, याचा सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “अजित पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यामुळे या अपघाताचा सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक तपास झाला पाहिजे,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
या दाव्यांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांतील तणाव आणखी वाढल्याचे चित्र आहे. या प्रकरणावर पुढे कोणता तपास होतो आणि प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

